आळंदी (पुणे) : आळंदीमध्ये मंगळवारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 724व्या संजीवन समाधी सोहळ्याची सुरुवात झाली. गुरुवर्य हैबतबाबांच्या पायरीचे पूजन करत या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे जनक म्हणून हैबतबाबा ओळखले जातात. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. असे असले तरी, पुढील सहा दिवस या सोहळ्याचे सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम परंपरेनुसार पार पडणार असल्याचे विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
हैबतबाबाच्या पायरीचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात..
मंगळवारी आळंदीमध्ये संजीवन समाधी सोहळा सुरू होत असताना, पहाटे माऊलींच्या समाधी मंदिरात होम, अभिषेक व दूध अभिषेक करत महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी पवित्र इंद्रायणीच्या काठावर व समाधी मंदिराच्या महाद्वारावर गुरुवर्य हैबतबाबाच्या पायरीचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.
तीन मानाच्या दिंड्या आळंदीत दाखल..
कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या काळात वारकऱ्यांचा आळंदीत मुक्काम असतो. ही परंपरा कायम ठेवत पंढरपुरातून आळंदीत कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या संत पांडुरंग, संत नामदेव आणि संत पुंडलिक या तीन दिंड्यांना राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तीनही दिंड्यासोबत प्रत्येकी वीस वारकऱ्यांना आळंदीत येण्यास परवानगी देण्यात आली असून, तीनही दिंड्या स्वतंत्र एसटी बसने आळंदीत दाखल झाल्या होत्या.
हेही वाचा : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार का? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी..