बारामती (पुणे) - मागील वर्षभरापासून कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधावर संशोधन केले जात आहे. अशावेळी बारामतीतील डॉ. किर्ती पवार यांनी हळद-काळी मिरीच्या मिश्रणापासून कोरोनावर औषध तयार केले आहे. कोरोना आजारामुळे रुग्णाच्या शरीरावर होणारे दुरगामी परिणाम या औषधाने टळू शकतात, असा दावा डॉ. पवार यांनी केला आहे.
बारामतीच्या डॉक्टरांनी हळद आणि काळी मिरी यांच्या मिश्रणातून कोरोनावरील उपचारासाठी औषध शोधून काढले आहे. या औषधाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. हळदीमध्ये असणारा 'करक्युमीन ' हा पोषक घटक व काळी मिरी यांच्या मिश्रणातून औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. या औषधाच्या वापराने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होऊ शकतात. तसेच कोरोना आजारामुळे रुग्णाच्या शरीरावर होणारे दुरगामी परिणाम टाळता येऊ शकतात, असा दावा डॉ. किर्ती पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.
डॉ. किर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद , डॉ. सतीश पवार, सम्राज्ञी पवार, डॉ. रमेश भोईटे , डॉ. राहुल भोईटे, डॉ. मीनल कुलकर्णी व संख्याशास्त्रज्ञ आदिती देशपांडे या टीमने संशोधनात सहभाग घेतला आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनामुळे भारतासह जगभरातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत होणार आहे. शिवाय वैद्यकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रण असलेली गोळी युएसएफडीए मान्यताप्राप्त आहे. कोव्हीड होऊ नये म्हणून ही रोज एक गोळी घेतल्यास त्याचा प्रतिबंधात्मक उपयोग होऊ शकत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
हेही वाचा-'सरकारशिवाय कोणालाही रेमडेसिवीर खरेदीचा अधिकार नाही'
संशोधनाचा निष्कर्ष-
- करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रणयुक्त गोळ्या दिलेल्या रुग्णांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे कमी होऊन रुग्ण लवकर बरे झाले.
- हे औषध दिलेल्या रुग्णांमधील गंभीरतेचे प्रमाण खूप कमी झाले.
- हे औषध न दिलेल्या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी ७ ते २७ दिवस होता.तर करक्युमीन घेतलेल्या रुग्णांचा ५ ते १० दिवस होता.
- करक्युमीन घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज कमी भासली.
- मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमधील मृत्युदर कमी झाला.
- या हळदीच्या गोळीमुळे रक्त न गोठता प्रवाही राहण्यास मदत झाल्यामुळे कोव्हीडमुळे फुफ्फुसावर होणारे दुष्परिणाम, ह्रदयाच्या, फुफ्फुसाच्या व
शरीरातील रक्तवाहिन्यांमध्यें होणाऱ्या गुठळ्या, असे घातक दुष्परिणाम टाळण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली. - कोरोना होऊन गेल्यावरही पुढील ३ महिने या गोळीचा मर्यादित स्वरूपात वापर करून कोरोनामुळे होणारे दुरगामी परिणाम टाळण्यासाठी मदत होऊ शकते.