पुणे - पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपदनास शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. केसनंद, बकोरी वाडेबोल्हाई, वाघोली आणि कोलवडी येथील शेतकऱयांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. आमच्या जमिनी संपादन करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा पवित्रा या गावातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.
मागील १५ वर्षापासून पुणे-नाशिक हायस्पीड प्रकल्पास रेल्वे प्रकल्पासाचे आश्वासन दिले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रकल्प होणार असल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, या प्रकल्पाला पूर्व हवेलीतील स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे प्रकल्प आमच्याकडे नको, या रेल्वे प्रकल्पापासून स्थानिकांना कोणताही फायदा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आमच्या भागात कोणतेही मोठे स्टेशन नाही. या प्रकल्पामुळे शेतकरी विस्थापित होईल, अशी भीती स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा प्रकल्प बंद करण्याबाबत ८ दिवसात सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलन करू अशी भूमिका शेतकऱ्यांनी जाहीर केली आहे. कचरा प्रकल्प, रेल्वे प्रकल्प, रिंग रोड, मोठ्या क्षमतेच्या विद्युत प्रवाह तारा यासारख्या बिन कामाच्या योजना पूर्व हवेलीतच का ? अशा सवाल स्थानिक शेतकरी, नागरिकांमधून विचारला जात आहे.