पुणे - 'विरोधक आरोप-प्रत्यारोप करणारच. त्यांनीही कर्जमाफी केली होती. दीड लाखाचे कर्ज माफ केले होते, पण त्यावरचे व्याज भरले तरच कर्जमाफी होणार होती. काही शेतकऱ्यांनी दीड लाखांपेक्षा अधिक असणारे कर्ज भरले पण अजूनही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही,' असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली.
ते पुढे म्हणाले, त्यांनी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे केले. वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडले. कर्जमाफीचा 'जीआर' ३० वेळा बदलला. अशाप्रकारे मागचे सरकार अडकत-अडकत चालले होते. आताच्या सरकारने सरकसकट दोन लाखांची कर्जमाफी केली. त्यामुळे 95 टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
हेही वाचा - ठाकरे सरकारचे पाहिले अधिवेशन, ६ दिवसात विधानपरिषदेत ३४ तास कामकाज
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात नवीन आमदारांना बोलण्याची संधी अध्यक्षांनी दिली. सर्व आमदारांनी आपल्या अडचणी सभागृहात मांडल्या. या नवनियुक्त तरुण आमदारांनी कदाचित पाहिल्यांदाच वेगवेगळे मुद्दे सभागृहात मांडले. 'ग्लोबल वॉर्मिंग' विषयी, शहरातील समस्यांविषयी काही मुद्दे या आमदारांनी सभागृहात मांडले.
आदिती तटकरे, योगेश कदम, सुनील शेळके, धीरज देशमुख, विश्वजित कदम यांची भाषणे चांगली झाली. या सर्वांच्या भाषणात फक्त स्टाईल नव्हती ते वेगवेगळे मुद्दे मांडत होते. त्यांनी फक्त मुद्देच नाही मांडले तर त्यावर काम कसे करता येईल हे सुचवले. नवीन आमदारांना सभागृहात बोलण्याची संधी दिली म्हणून आम्ही सर्व खूश आहोत, असेही रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन 2019: राज्य सरकारने जाहीर केलेल्या महत्वपूर्ण घोषणा