पुणे - ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महावितरणच्या भारनियमनाचा सर्वाधिक फटका बसत असून रात्रीच्या अंधारात शेतीला पाणी देण्याचे काम करावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतीचे नियोजन करणे कठीण झाले आहे. या समस्येवर कायमस्वरुपी पर्याय म्हणून शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानातून कमी खर्चात हवा व सौरऊर्जेवर चालणारी हायब्रीड पवनचक्की तयार केली आहे. यातून मिळणाऱ्या विजेवर शेतीपंपाला व घरगुती वीज मिळू लागली आहे. या हायब्रीड पवनचक्कीमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत असून विजेची कायमस्वरुपी समस्या सुटणार असल्याचे ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून शेतीविषयक विविध प्रयोग राबवले जात आहेत. ग्रामीण भागात शेतीबरोबर जोड व्यवसाय करत असताना विजेची 24 तास गरज असते मात्र ग्रामीण भागातील विजेचे भारनियमन शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत होती. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पाबळ येथील विज्ञान आश्रम संस्थेची मदत घेऊन व अमेरिकन तंत्रज्ञानाचा उपयोग करून हवा व सौरऊर्जेवर चालणारी पवनचक्की तयार करण्यात आली यातून तासाला तीन किलो वॅट वीज निर्मिती केली जाते.
![load shedding in junnar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-1-pawanchakki-spl-mh10013_30122020225315_3012f_03858_1016.jpg)
आपल्या भागात हवा मोठ्या प्रमाणात वाहते. त्यामुळे हवा व उन्हावर चालणाऱ्या पवनचक्कीची क्षमता जवळपास तीन किलो वॅटपर्यंत नेणे शक्य आहे. वाऱ्याचा वेग फार कमी झाल्यास त्यामध्ये तयार होणारी वीज कमी प्रमाणात असते. ही कमी झालेली क्षमता पूर्ण करण्यासाठी सौरऊर्जेचा बॅकअप दिला आहे. त्यामुळे प्रथम पवनचक्कीची ऊर्जा कमी पडली तर सौरऊर्जा वापरली जाते. पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसतो तेव्हा पवनचक्कीच्या हवेवर ऊर्जा तयार करते तर उन्हाळ्यामध्ये वारा कमी असतो तेव्हाच सौरऊर्जेची मदत घेण्यात येते बंद करू का मोठी त्यामुळे शेतकऱ्यांना शेतपिकाचे नियोजन करत असताना विजेची समस्या भासणार नाही. या पवनचक्कीमध्ये घर्षण करणारे भाग, बॅटरी व इन्व्हर्टर नसल्याने देखभाल व दुरुस्तीची फारसा खर्च येत नाही. त्यामुळे ही हायब्रीड पवनचक्की शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे.
पवनचक्कीला शासकीय अनुदानाची गरज
शेतकऱ्यांच्या बांधावर अशा पद्धतीने विजेचा प्रकल्प म्हणून पवनचक्की उभारल्यास विजेच्या भारनियमनाची समस्या सुटून शेतकऱ्यांना विना खर्चात वीज उपलब्ध होईल. या पवनचक्कीच्या वापरातून कोणतेही प्रदुषण होत नसल्याने शेतीसह घरगुती वापरासाठी वीज अगदी सहज उपलब्ध होईल. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून हवा व सौरऊर्जेवर चालणाऱ्या पवनचक्कीला अनुदानाच्या माध्यमातून हातभार लावल्यास शेतकऱ्याच्या प्रत्येक बांधावर पवनचक्की उभी राहणार असल्याचा विश्वास ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम यांनी व्यक्त केला.