पुणे - कोथरूड येथे खून झालेल्या एका १६ वर्षीय मुलाच्या सांगाड्यावर (हाडांचा सापळा) तब्बल १७ वर्षानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगड्यावर अंत्यसंस्कार करायला इतका विलंब झाल्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, उशिरा का होईना त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्याने त्याला मुक्ती मिळाल्याची भावना देखील काही जण व्यक्त करत आहे. निखिल रणपिसे, असे अंत्यविधी करण्यात आलेल्या अल्पवयीने मुलाचे नाव आहे.
यासंदर्भात कोथरुडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2002 साली एमआयटी कॉलेजजवळ निखिल रणपिसे (वय.१६) याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. तपासणीनंतर त्याचा सांगाडा कोथरूड पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला होता.
निखिलचा खून केल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध खटला चालवण्यात आला होता. न्यायालयाने निखिलच्या सांगाड्याची विल्हेवाट लावण्याची परवानगी दिली होती. मात्र, काही कारणास्तव त्याच्या सांगाड्याची विल्हेवाट लावण्यास विलंब झाला होता.
यानंतर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी सर्व पोलीस ठाण्यांना मुद्देमाल कक्षाच्या स्वच्छतेचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी त्याच्या कुटुंबीयांना शोधून अंत्यसंस्कार संदर्भात माहिती दिली होती. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी निखिलच्या अंत्यसंस्कारासाठी पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर निखिलच्या कुटुंबीयांनी कोथरूड पोलिसांच्या मदतीने विद्युत दाहिनीत त्याच्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे जोशी यांनी सांगितले.