पुणे - कोरोनावरील लस आपल्याकडेच तयार होते. तरीदेखील या लसींचे दर इतके महाग का, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच ही लस सर्वांना 150 रुपयांत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कोरोनामुळे मी आठवडाभराचा मुदत देतो, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
होम क्वारंटाईनमुळेदेखील रुग्णसंख्येत वाढ -
देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असली, तरी 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. परंतु या लसीचे जाहीर केलेले दर हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहेत. लसीच्या या दराबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री गप्प का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. वाढणाऱ्या रुग्णांना व्यवस्थित उपचार देण्यासाठी सरकारने होस्टेल ताब्यात घ्यावेत. वेळ आल्यास प्रायव्हेट हॉटेल आणि हॉस्पिटलदेखील ताब्यात घ्याव्यात. होम क्वारंटाईनमुळेदेखील संख्या वाढत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ही याबाबत आतापर्यंत योग्य ती दक्षता घेतली नाही. त्यामुळे यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सामंजस्य असणाऱ्या व्यक्तींना सोबत घेऊन चर्चा करा, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.
कोविड वाढताना मोदी निरोसारखे वागत होते -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांनी कोविड वाढताना मोदी निरोसारखे वागत असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान निधीमध्ये आतापर्यंत किती निधी आला याची माहिती सामान्य जनतेसमोर आली नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात टाकलेली याचिकादेखील सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. हायकोर्ट ज्याप्रमाणे काम करत आहे, तशी काम सुप्रीम कोर्ट करत नाही. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत पंतप्रधान निधीत हजार कोटीहून अधिक पैसे आले. ही पैसे देशातील कोविड परिस्थितीसाठी खर्च केले पाहिजेत. राज्यात कोरोना वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी निरोसारखे वागत होते. रोम जळत असताना नीरो व्हायोलिन वाजवत होता यांचे लक्ष बंगालवर होते, अशी जळजळीत टीका ही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरण : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांचे समन्स