पुणे - येथली पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान, निगडी आणि यमुना नगर परिसरात अत्यंत दूषित पाणी येत असून आज शिवसेनेच्या माजी गट नेत्या सुलभा उबाळे यांच्या घरी दूषित पाणी आले. याचा जाब विचारण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, माजी गटनेत्या सुलभा उबाळेसह इतर कार्यकर्त्यांनी घेराव घालत त्यांना दूषित पाण्याची बाटली भेट दिली.
हेही वाचा- चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक; 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणी असताना आयुक्त हर्डीकर यांनी हे पाऊल उचलले. परंतु, निगडी आणि यमुना नगर येथील प्रभागात दूषित पाणी येत असल्याची तक्रार वारंवार करून महानगर पालिका धडा घेत नाही. दरम्यान, आज सकाळी शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांच्या घरी दूषित (गढूळ) पाणी आले. ते एका बाटलीत बंदिस्त करून त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना घेराव घालून त्यांना दाखवले.
शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. येणाऱ्या आठ दिवसात महानगर पालिकेच्या आयुक्तांनी ठोस निर्णय न घेतल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.