बारामती - शहरातील प्रितम शहा यांच्या आत्महत्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या या सर्व आरोपींना बारामती न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
प्रितम शहा लेंगरेकर यांनी विष पिऊन आत्महत्या केली होती. पैशांच्या मोबदल्यात त्यांचे घर लिहून घेतल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप आहे. या आत्महत्या प्रकरणात विद्यमान नगरसेवक जयसिंग ऊर्फ बबलू देशमुख, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय कोंडीबा काटे, जयेश ऊर्फ कुणाल चंद्रकांत काळे, हनुमंत सर्जेराव गवळी, प्रवीण दत्तात्रय गालिंदे, सुनील ऊर्फ सनी आवाळे यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचा तपास पूर्ण झाला आहे. पैशांची देवाण-घेवाण हा व्यवहार असून, त्याला सावकारी म्हणता येणार नाही, अस मत यावेळी न्यायालयाने नोंदवत त्यांना जामीन मंजूर केला.
नेमके काय होते प्रकरण?
प्रितम शहा यांना आरोपींनी व्याजाने पैसे दिले होते. दिलेल्या पैशाच्या व्याजवसुलीसाठी त्यांनी शहा यांच्याकडे तगादा लावला होता. तसेच त्यांच्या मालकीचे घर देखील नावावर करून घेतले होते. त्यामुळे शहा यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये शहा यांनी वरील सर्वांची नावे लिहिली होती. याप्रकरणी शहा यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा - पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या चारचाकीने घेतला पेट
हेही वाचा - वेल्ह्यात किरकोळ कारणावरून मुलाची वडिलांना मारहाण; उपचार सुरू असताना मृत्यू