पुणे - देशात नवरात्रोत्सव सुरू असून सध्या जिल्ह्यातील मावळ परिसरात शेतात राबणारी एक वनदुर्गा चर्चेत आहे. दुचाकी, ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, चारचाकी चालवणारी ही वनदुर्गा सेंद्रिय शेती करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आहे. आठ वर्षांपूर्वी दुचाकीच्या अपघातात पतीचा मणक्याला जबर मार लागल्याने शेती कशी करायची, असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे होता. परंतु, त्याची पत्नी म्हणजे 'वनदुर्गा' रुपाली नितीन गायकवाड यांनी सर्व जबाबदारी खांद्यावर घेत पती नितीन यांच्या खांद्याला खांदा लावून शेती करत आहेत. गेल्या सोळा वर्षांपासून त्या शेतात राबत असून वर्षाकाठी त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. 2017-18 साली राज्याच्या शेतीनिष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर, पीक स्पर्धेत त्यांनी जिल्ह्यातून अव्वल नंबर देखील पटकावला होता. त्यामुळे या वनदुर्गाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
रुपाली नितीन गायकवाड या मावळमधील चांदखेड येथे राहतात. त्यांना शेतीची लहानपणापासूनच आवड होती. वडील नसल्याने त्यांची आई शेतात एकटीच राबायची. त्या नेहमी शेतातून चांगलं उत्पन्न घेत असत. तेव्हापासून रुपाली यांनाही शेतीविषयीचे आकर्षण आणि आवड निर्माण झाली. कालांतराने रुपालीचा विवाह झाला. नितीन यांना देखील शेतीची आवड असल्याने दोघांची जोडी चांगली जमली. शेतात राबायची आवड असल्याने सासरची पडीक जमीन रुपाली आणि त्यांच्या पतीने मेहनत करून कसदार बनवली. त्यात वेगवेगळे प्रयोग केले, आणि त्यात रुपाली यांना यश आले. पुन्हा, सेंद्रिय शेती करत फळबाग, वेगवेगळ्या भाज्या, भाताची लागवड केली असे रुपाली सांगतात.
सुखी संसार सुरू असताना आठ वर्षांपूर्वी नितीन गायकवाड यांचा दुचाकीवरून पडल्याने अपघात झाला. यात त्यांच्या पाठीचा मणका दुखावला गेला. त्यांना शेतातील काही काम आणि पॉवर ट्रेलर चालवण्यास त्रास होऊ लागल्याने वनदुर्गा रुपाली यांनी ट्रॅक्टर चालवण्याचा निश्चिय केला. तसे नितीन यांनी पाठबळ देत ट्रॅक्टर चालवण्यास त्यांना शिकवले. अगोदर नितीन यांनी नकार दिला होता. आज चारचाकी, ट्रॅक्टर, शेतात उपयोगी असणारे पॉवर ट्रेलरदेखील रुपाली या चालवतात. हे सर्व पाहता नितीन यांना रुपाली यांचं कौतुक आणि अभिमान आहे असे ते सांगतात.
आधुनिक पद्धतीने शेती करत असल्याचे नितीन गायकवाड म्हणाले. शेतात, फळबाग, भात, ही पीके घेतली जातात. शेती करायला नेहमीच आवडत होती, त्यात पत्नीची साथ लाभली. मात्र, दुचाकीवरून पडल्याने अपघात झाला त्यात त्यांचा मणका दुखावला गेला. त्यामुळे शेती कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. पण, एकमेकांची साथ असल्याने आम्ही दोघांनी मिळून शेती सांभाळली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पत्नीने विश्वास दिला आणि खांद्याला खांदा लावून शेती करू, असे म्हटले असल्याचे नितीन सांगतात. गेली 16 वर्ष आम्ही संसार करत आहोत. लग्नावेळी दिलेलं वचन आजही रुपाली काटेकोरपणे पळत असून शेतात राबत असल्याचे नितीन आवर्जून सांगतात. या आधुनिक युगातील शेतकरी वनदुर्गा रुपाली नितीन गायकवाड यांना 'ईटीव्ही भारत'चा सलाम.
हेही वाचा - मुठा नदीत वाहून गेलेल्या 'त्या' दोन तरुणांचे मृतदेह सापडले