पुणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना वर्तकनगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली अटक केली होती. आता एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. आव्हाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम 354 अन्वये ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया ( Ambadas Danave on Jitendra Aavhad resignation ) दिली आहे.
तक्रारदार महिला भाजपच्या पदाधिकारी - जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. यावर विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, तीन दिवसा आधीच जितेंद्र आव्हाडांवर एक गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली व त्यांची जामीनवर सुटका देखील झाली. गर्दीतून जाताना एखाद्या व्यक्तीला धक्का लागला तर तो विनयभंग होत नाही. ज्यांनी तक्रार दाखल केली आहे. ती तक्रार जाणीवपूर्वक तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित महिला या भाजपच्या पदाधिकारी आहेत, असा आरोप यावेळी दानवे यांनी केला.
जितेंद्र आव्हाड लढवय्ये कार्यकर्ते - जितेंद्रा आव्हाड हे नुसतेच नेते नसून तर ते लढवय्ये कार्यकर्ते देखील आहेत. म्हणून त्यांनी राजीनामा न देता प्रवृत्तीच्या विरोधाती लोकशाही मार्गाने लढा दिला पाहिजे, असे दानवे म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलच्या मुख्य निवडणूक कचेरीचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार व अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.