परभणी- नुकत्याच झालेल्या खरिपाच्या पेरणीमध्ये जिल्ह्यातील ५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बोगस बियाणे उपलब्ध झाल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला. याप्रकरणी बोगस बियाणे पुरवणाऱ्या इंदौर येथील इगल बियाणे उत्पादक कंपनीकडून शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे, या कंपनीच्या मालकापर्यंत पोहोचून गुन्हे दाखल होतील. तसेच, त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना केले जाईल, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा झेंडावंदन कार्यक्रम पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मलिक बोलत होते. पत्रकारांना माहिती देताना नवाब मलिक यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग गंभीर नसल्याचे सांगितले. मृत्यूचे प्रमाण वाढत असले तरी मरण पावणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे त्यांना यापूर्वी झालेल्या काही गंभीर आजारांमुळे मरण पावले आहेत. तसेच, परभणी शहरात खासगी रुग्णालयांमध्ये नवीन ८ कोरोना सेंटर्सना मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
'प्रत्येक दवाखान्यात रुग्णाला आकारल्या जाणाऱ्या फीसचा फलक लावणे आम्ही बंधनकारक केले आहे. त्यामुळे, प्रत्येक रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना नेमकी किती फीस द्यावी लागेल याची माहिती मिळेल आणि यासाठी प्रशासन त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
इगल कंपनीच्या मालकांना अटक होणार -
तसेच, नुकत्याच झालेल्या खरीप पेरण्यांच्या काळात परभणी जिल्ह्यातील सुमारे ५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बोगस बियाणे उपलब्ध झाल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. यासंदर्भात, प्रशासनाने महाबीजला यादी दिल्यानंतर महाबीजने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे कबूल केले आहे. परंतु, सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनी असलेल्या इंदोर येथील इगल या कंपनीकडून मात्र प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मालकांना आरोपी करून त्यांच्या अटकेसाठी परभणीतून इंदोरला पोलीस पथक देखील रवाना होणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली.
कंपन्यांनी आपल्या बियाण्यांची जबाबदारी स्वीकारावी -
त्याचबरोबर, ज्या बीज कंपन्यांना आपले बियाणे विकायचे आहे, त्यांनी त्यांच्या बियाण्यांची जबाबदारी देखील स्वीकारायला हवी. आपले बियाणे चुकीचे असतील तर त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिलाच पाहिजे. मात्र, इगल कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या मालकापर्यंत पोहोचून पोलिसांच्या माध्यमातून गुन्हे दाखल होतील आणि त्यांना अटक देखील करण्यात येईल, असे मलिक यांनी सांगितले.
आता पान टपऱ्या, हॉटेल्स सुरू होणार -
विशेष म्हणजे, जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून पानटपऱ्या आणि हॉटेल्स बंद आहेत. यासंदर्भात पालकमंत्र्यांना काही नागरिकांनी दिलेल्या निवेदनावरून पानटपऱ्या आणि हॉटेल्सना परवानगी दिल्याचे सांगितले. परंतु, हॉटेल्समध्ये नागरिकांनी गर्दी न करता चहा पिऊन लवकर तेथून निघून जावे. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, अशी अपेक्षा मलिक यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी, महापालिकेचे आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा- परभणीत 'अँटिजेन' तपासणीसाठी व्यापाऱ्यांना दोन दिवस मुदतवाढ; तरच दुकाने उघडता येणार