पालघर - पुरुषांची मक्तेदारी असलेल्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मग ते कोणतेही क्षेत्र असो. पालघर जिल्ह्यातील पोशेरी येथील अशाच काही महिलांनी आपल्या आर्थिक उन्नती आणि सक्षमीकरणासाठी मत्स्यव्यवसाय बीज उत्पादन हे उदरनिर्वाहाचे साधन निवडले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने 'दामिनी' या मालिकेच्या माध्यमातून घेतलेला हा विशेष आढावा...
पालघर जिल्ह्य़ातील पोशेरी येथील शिंगडापाडा हा आदिवासी बहूल समाज आहे. या पाड्यातील मोगरा, आबोली आणि गुलाब ही तीन महिला गट आहेत. या तिन्ही गटांनी अशा एकूण 36 महिलावर्गाने एकत्र येऊन मत्स्यबीज उत्पादनाला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या या तीन एकराच्या पाझर तलावात ते मत्स्यबीज टाकतात. यानंतर त्यातून आलेले मासे या महिला स्वत: बाजारात विक्रीसाठी आणतात. तसेच बाहेरील व्यावसायिकांना सुद्धा ते मासे 200 रुपये किलो किंमतीने विकतात आणि याच माध्यमातून आपला उदरनिर्वाह करतात.
हेही वाचा - महिला दिन विशेष : 40 कंपन्यांचे नेतृत्व, 7 हजार हातांना रोजगार; असा आहे बीडच्या या 'सुपरवुमन'चा प्रवास
पोशेरी येथे विविध महिला गट आहेत. सन 2017 पासून हे महिला गट सुरू करण्यात आले. या महिला गटांना गावातील स्वरा सुनिल शिंगडा, विद्या विलास पाटील, सुनिता सुनिल खरपडे या 'उमेद'च्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. त्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून रहू, कटला, मुरगल जाती मत्स्यबीजचे 36 डबे टाकले. यात त्यांना 17 हजार रूपये खर्च आला. हा खर्च म्हणून त्यांनी प्रत्येकी 500 रुपये गोळा केले. यात जाळे आणि इतर खर्चाचा समावेश होता. यावर त्यांना 96 हजार रुपयांचे मत्सउत्पादनातून फायदा झाला, अशी माहिती पोशेरीतील कृषी सखी स्वाती खरपडे यांनी दिली. तर आता या महिलांना या व्यवसाय वृद्धिकरिता तलावातील गाळ काढून खोली करायची आहे. म्हणून शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.