पालघर/विरार - विरारमध्ये घोणस जातीच्या विषारी सापाला पकडण्यात वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. विरार पूर्व कांबेश्वर सोसायटीच्या संरक्षण भिंतीजवळ हा विषारी साप दबा धरून बसलेला होता. बेडूक किंवा अन्य काहीतरी त्याने खाल्ले असल्याने तो सुस्त होऊन भिंतीच्या कडेला बसला होता. स्थानिक राहिवाशांनी याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन स्ट्रेचरच्या साहाय्याने सापाला पकडले.
जंगल नष्ट झाल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत?
वसई विरार परिसरातील जवळपास जंगल नष्ट होऊन, काँक्रीटीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जंगलातील जीव हे आता मानवी वस्तीत शिरत आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे बिळात किंवा लपायाच्या ठिकाणी पाणी साचल्याने हे साप आता दर्शनीय ठिकाणावर येत आहेत. ज्या ठिकाणी त्यांना लपायला जागा मिळते तिथे ते आपले वास्तव्य करीत आहेत. सोयायटी किंवा झाडाझुडपात हे सध्या मोठ्याप्रमाणात आढळत आहेत.
विषारी जातीचा घोणस साप
घोणस हा साप अतिशय विषारी असून, जर चावला तर त्या ठिकाणाचा भाग सडून जातो, अथवा तात्काळ उपचार नाही मिळाला तर चावलेल्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. पावसामुळे बिळात पाणी शिरल्याने ते बाहेर निघून दर्शनीय ठिकाणावर फिरत आहेत. सध्या त्यांच्या प्रजननचा काळ असल्याने ते प्रजननसाठी आपली जागाही शोधत असतात. या सापाला आम्ही सुखरूप जंगलात सोडणार आहोत, असे वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान जगन्नाथ गुजनूर आणि जयेश भोईर यांनी सांगितले.
हेही वाचा - 'कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटशिवाय डेल्टा प्लसही चिंताजनक'