पालघर - कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात हाहाकार माजला असून भारतातही कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ग्रामीण भागात मात्र कोरोना विषयी प्रभावी जनजागृती नसल्यामुळे आदिवासी महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या कुटुंबीयांना मोठा अडचणीचा सामना करावा लागला आहे. अन्य आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जवळचे नातेवाईकही तयार होत नसल्याची घटना समोर आली आहे.
![due to rumors of corona tribal community in palghar faced issue for funeral](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-03-difficultiesfacedbyfamilyforfuneral-7204237_10042020200946_1004f_1586529586_709.jpg)
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नांदगाव ग्रामपंचायतीमधील पालवी पाड्यातील एक २८ वर्षीय आदिवासी महिला दीड वर्षांपासून रक्तशयाने पीडीत होती. मंगळवारी या महिलेचा भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात मृत्यु झाला. आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर भिवंडीहून या महिलेचा मृतदेह शववहिनीतून नांदगाव येथे आणला. मात्र, सर्वत्र सुरू असलेल्या कोरोनाच्या भीतीपोटी हा मृतदेह गावात आणण्यास पालवी पाड्यातील नागरिकांनी सुरुवातीला विरोध दर्शविला. त्यानंतर अनेक प्रयत्नांतून मृतदेह घरी आणला खरा, पण या महिलेच्या अंत्यदर्शनासाठी नातेवाईक सोडून कोणीच आलले नाही.अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू करताना नागरिकांच्या असहकाराने सरण मिळणे कठीण होऊन बसले होते. शेवटी या महिलेच्या पतीने पत्नीचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतला.
ही बाब गावचे सरपंच पवन सावरा यांना कळताच त्यांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेत सचिन डावरे, कैलास पवार आदी गावच्या तरुणांना एकत्र करत पीडित कुटुंबाला धीर दिला व अंत्यसंस्कार करण्याचा मार्ग मोकळा झाला. या तरुणानी एकत्र येत अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य गोळा करून सरणाची व्यवस्था केली. त्यानंतर हिंदू परंपरेनुसार मृतावर अंत्यसंस्कार केले गेले.