पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले तिहेरी हत्याकांडानंतर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानंतर आता दत्तात्रय शिंदे यांची पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दत्तात्रय शिंदे हे सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मुंबई या ठिकाणी कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी शासन आदेशाद्वारे या नियुक्तीची माहिती दिली असून कामाच्या ठिकाणावरून त्यांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दत्तात्रय शिंदे पालघरचे नवे पोलीस अधीक्षक; गडचिंचले प्रकरणानंतर गौरव सिंग यांची अखेर बदली पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात आतापर्यंत १४२ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ९ जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच ३५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास सीआयडी करत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ७ मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. आता गौरव सिंग यांची बदली करण्यात आली असून पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.