उस्मानाबाद - भोगावती नदीतील अंदाजे दीड कोटी रुपयांची वाळू ढापण्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामसेवकाने केला असल्याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केल्यानंतर महसूल प्रशासनाला जाग आली आहे. यासंदर्भातील चौकशीसाठी संबंधीत मंडळाधिकाऱ्याने वाळू साचून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्या अधिकाऱ्याला आमच्या प्रतिनिधीने फोनवरुन संवाद साधला असता ते हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले.
वास्तव काय आहे?
उस्मानाबाद शहराला वळसा घालून जाणाऱ्या भोगावती नदी परिसरातील वाळू एका ग्रामसेवकाने आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीत साठवून ठेवल्याची माहिती तेथील स्थानिकांच्या मदतीनने आमच्या प्रतिनिधीला कळली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेतल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या व जेथून वाळू उपसली आहे, त्याठिकाणचे वृक्षतोड झाली असल्याचे निदर्शनास आले. वास्तविक पाहता सदर वाळूची उंची सात फूट तर दक्षिणोत्तर लांबी 70 फूट आणि पूर्व-पश्चिम लांबी 50 फूट एवढी आहे. अशा प्रकारे वाळूचा साठा करुन ठेवल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, मंडळाधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार 22 ब्रास वाळू तिथे असून, त्या ग्रामसेवकाने स्वतः चे घर बांधण्यासाठी व शेतातील 3 विहिरीचे बांधकाम करण्यासाठी भोगावती नदी मधील वाळू काढली आहे.
आमच्या प्रतिनिधींनी मंडळाधिकाऱ्याशी साधलेला संवाद -
वाळू उपसण्यासाठी ग्रामसेवकाने कुठली परवानगी घेतली होती का?
वाळू उपसण्यासाठी परवानगी घेतली असल्याचे उत्तर त्या अधिकाऱ्याने दिले. त्यानंतर परवानगी कधी घेतली असा प्रश्न विचारला असता त्यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.
वास्तव - वाळू उपसण्यासाठी जिल्ह्यातील परंडा व उमरगा येथील धरणासाठी वाळू उपसण्यासाठीच्या परवानग्या देण्यात येतात. मात्र, यावर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे ही प्रक्रिया अद्याप पार पडली नाही. मात्र, तरिही मंडळ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या ग्रामसेवकाने वाळू उपसण्यासाठी परवानगी घेतली असल्याचे सांगितले.
वाळू उपसण्यासाठी नदीमध्ये प्रचंड वृक्षतोड केली असून या संदर्भात परवानगी घेतली आहे का?
ग्रामसेवकांने अद्याप वृक्षतोडीसाठी परवानगी घेतली नाही. मात्र, लवकरच ते वृक्षतोडीची परवानगी घेणार असल्याचे गोलमाल उत्तर मंडळाधिकाऱ्याने दिले.