उस्मानाबाद - जिल्ह्यातील शीला अतुल साखर कारखान्याने ६ महिन्यांपासून ऊस गाळपाचे पैसे दिले नसल्याने औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव येथील शेतकऱ्यांनी 'शोले स्टाईल' आंदोलन केले. त्यानंतर कारखान्यातील काम बंद करून प्रशासनासह शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस प्रशासनाने दखल देत शेतकऱ्यांना शांततेचा सल्ला दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.
तालुक्यातील नितळी येथील 'शीला-अतुल साखर कारखाना' भाडेतत्वावर एका खासगी व्यक्तीला चालविण्यासाठी देण्यात आला आहे. २०१८-१९ च्या गळीत हंगामात अनेक शेतकऱ्यांनी कारखान्यास गाळपासाठी ऊस दिला, जानेवारी २०१९ मध्ये पदरमोड करून ऊसाचे गाळप केले. मात्र, तेव्हापासून अनेक शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले गेले नाहीत. याप्रकरणी नकुलेश्वर बोरगाव येथील १५ शेतकरी कारखाना स्थळावर आले. त्यांनी प्रथम प्रशासनाबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने अखेर त्यांनी आंदोलन सुरू केले.
हेही वाचा -प्रलंबित मागण्यांसाठी पॉलिहाऊस शेडनेट धारक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
या आंदोलनादरम्यान ६ ते ७ शेतकरी कारखान्याच्या १५० फूट उंच चिमणीवर जावून बसले होते, आणि पैसे दिल्याशिवाय खाली उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. कारखाना प्रशासनाला याबाबतची माहिती मिळताच धावपळ करीत प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वीच उर्वरीत शेतकऱ्यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. तेव्हा कर्मचारीही कारखान्याबाहेर जाऊ लागले. दरम्यान काही पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर हळूहळू चिमणीवर चढलेले शेतकरी खाली उतरले. दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासन तसेच सरकारच्या विरोधात 'हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत, पैसे मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही' म्हणत घोषणाबाजीही केली.
हेही वाचा - पेट्रोल पंपावर दरोडा; दोन लाखांची रोकड लंपास