उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील वांगी (बु.), ता. भुम या गावातील सुभाष आण्णा पवार याने गांजा हा अंमली पदार्थ बाळगल्याने त्याच्याविरुध्द उस्मानाबाद ( Osmanabad Crime ) आणि आंध्रप्रदेशात ( Andhra Pradesh Crime ) गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामीनावर मुक्त आहे. त्याने आंध्रप्रदेशातील एका कुटूंबातील 5 व्यक्तींचे व त्यांच्याच एका नातेवाईकाचे अपहरण ( Kidnapping ) करुन त्यांना अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले होते. तसेच 2 मेट्रीक टन गांजा आणुन दिल्यावरच त्यांची सुटका करण्यात येईल, अशी धमकी सुभाष पवार याने नातेवाईकांना दिली होती. या प्रकरणी आंध्रप्रदेशातील जीके विधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासा दरम्यान आंध्रप्रदेश पोलिसांचे पथक उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. त्यांना तपासा दरम्यान भाषेची अडचण जाणवत होती. या पथकाने स्थानिक पोलीसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. यावर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कळंब विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांना या प्रकरणात विशेष लक्ष घालण्यास सांगितले. यावर कळंब उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकातील पोलीस अंमलदार- किरण अंबोरे, नवनाथ खांडेकर, महेश शिंदे यांच्यासह आंध्र पोलीसांच्या संयुक्त पथकाने 26 आणि 27 जून दरम्यानच्या रात्री आरोपी सुभाष पवार राहत असलेल्या वांगी बु. येथील परिसरात पाळत ठेवली होती.
दरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की, सुभाष पवार याच्या घरात नमूद अपहृतांना डांबून ठेवले आहे. यावर पथकाने 27 जून रोजी सकाळी सुभाष पवार यास ताब्यात घेतले. तात्काळ पथकाने त्याच्या घरात डांबून ठेवलेल्या पांगी कुटूंबीय गोवर्धन, धनलक्ष्मी (वय- 4 ), संदीप (वय- 2 ), यशोदा (वय- 14) यांसह जेम्मीली नागेंद्र बाबू हे सर्व रा.एबुलम, जी.के. विधी मंडल, जि.अल्लुरी सितारामाराजु, राज्य- आंध्र प्रदेश यांची पथकाने यशस्वी सुटका केली. उस्मानाबाद पोलिसांनी दाखवलेल्या धाडस व सक्रीयतेबद्दल आंध्र पोलिसांच्या पथकाने उस्मानाबाद पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे. यावेळी सुभाष आण्णा पवार यासह नमूद 6 व्यक्तींना घेऊन आंध्रप्रदेश पोलीस आंध्रप्रदेशाकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा - उदयपूरच्या कन्हैयालालची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना बेड्या, 13 किलोमीटर पाठलाग करुन पोलिसांनी पकडले