नाशिक - गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने, कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबासोबत आक्रोश आंदोलन केले. तसेच थकीत वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. यात अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले, तर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. मात्र असे असूनही वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने थकीत वेतन लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज आक्रोश आंदोलन केले. या आक्रोश आंदोलनात कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. मुलांनी हातात शाळेतील पुस्तक घेऊन, आमच्या पालकांचे वेतन देण्याची विनंती केली.
वेतन न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
कोरोनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. त्यामुळे आणखी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची वाट न पाहता शासनाने तातडीने वेतन द्यावे, आशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - मालेगावातील युनानी डॉक्टरांचे काम कौतुकास्पद- अब्दुल सत्तार
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये १० नोव्हेंबरपासून फटाके वाजवण्यास बंदी