नाशिक - विविध चालीरीती आणि रूढी परंपरांना फाटा देत समाजात नवनवीन उपक्रम राबविण्याचा उपक्रम कळवण तालुक्यातील नवी बेज गावातील नागरिकांनी केला आहे. या गावाने मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी होणारा रक्षाविधीचा कार्यक्रम केला नाही. त्याऐवजी वृक्षारोपण कार्यक्रम करण्याचा निर्णय घेत जलप्रदूषण टाळून पर्यावरण रक्षाणाचा वसा जोपासत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
तीन दिवसांपूर्वी मविप्र समाज शिक्षक संस्थेतील माजी प्राचार्य जे.एस.पवार यांचे निधन झाले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नवी बेज येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर पारंपरिक रूढीप्रमाणे रक्षा विसर्जन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. पवार कुटुंबीय व समस्त गावकऱ्यांनी ठरवले की, आजपासून रक्षा विसर्जन हे नदीत न करता शेतात खड़्डा करून त्यात दिवंगत व्यक्तीच्या नावे एक झाड लावून त्याचे संगोपन त्या कुटुंबाने करावे. यामुळे मृत्यू व्यक्तीच्या स्मृती राहतील व जलप्रदूषणही होणार नाही. या हेतुने या पुढे नवी बेज गावात याच पध्दतीने रक्षा विसर्जन होईल, असा निर्णय गावातील नागरिकांनी घेतला. नवी बेज गावातील नागरिकांनी घेतलेल्या आदर्श निर्णयामुळे जल प्रदूषण टळेल, वृक्षारोपण होऊन वृक्षसंवर्धन होईल, लावलेल्या झाड १०० टक्के जगण्याची खात्री असेल.