नाशिक - एकलहरे भागात गेल्या दोन दिवसापासून बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत पाच जण जखमी झाले आहे. एकलहरे, जखोरी आणि चांदागिरी भागात बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ला करत आतापर्यँत 5 जणांना जखमी केल आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
एकलहरेच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ला चढवल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. परिसरातील जनावरांना भक्ष करणाऱ्या बिबट्याने आता मानवावर देखील हल्ले सुरू केल्याने गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शनिवारी सायंकाळी चांदागिरी येथून दुचाकीवरून जाणारे कुटुंबावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. तसेच दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पुन्हा एका दुचाकीस्वारांवर झडप घालून त्याला जखमी केले. उसाच्या शेतामध्ये बसलेल्या बिबट्याने अनेक ठिकाणी दर्शन घडू लागल्याने परिसरातील गावांमध्ये भीती निर्माण झाली आहे .यामुळे उसाच्या शेतातसुद्धा काम करण्यास कामगार तयार होत नाहीत.
तसेच बिबट्याने हिंगणवाडी, सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी आदी गावांमध्येसुद्धा जनावरांना भक्ष्य केल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी साडेसात वाजेच्या सुमारास चांदगिरी गावात शरद बागूल यांच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दौलत पवार यांच्यावर हल्ला केला, तर पिंपळस येथील पवार हे पत्नी आणि मुलांसोबत जात असताना बिबट्याने उसाच्या शेतातून येऊन हल्ला चढवला. यात तिघेही जखमी झाले आहेत. तसेच रविवारी विश्वास कळमकर यांच्या शेतात काम करणारे शेतमजूर मधुकर बरब आणि एकनाथ गरेल हे मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्यावर झडप घातली. एकूणच या घटनांमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने या ठिकाणी पिंजरे लावावेत अशी मागणी होत आहे.