नाशिक - आज कोरोनाच्या महामारीत सगळं जग घरात बसलेलं असताना त्याला अन्नपुरवठा करण्याचं काम शेतकरी अविरतपणे करत आहे. यात अनेक शेतकरी कोरोनाग्रस्त झाले. पण जगाच्या पोशिंद्याने हे काम थांबवले नाही. आजार कोणताही असो, शेतकऱ्याचं मरण ठरलेलच अशी खंत यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली. आज घरातल्या-घरात किसान सन्मान दिन साजरा केल्याची माहितीही त्यांनी दिली.
अखिल भारतीय किसान संघर्ष समिती व राजू शेट्टी यांनी आवाहन केल्याप्रमाणे आज सकाळी अंगणात किंवा शेतात, हातात अवजारे घेऊन, देशाचा तिरंगा, अथवा संघटनेचा झेंडा घेऊन 'गर्व से कहो हम किसान है' आशा घोषणा दिल्या.
लहान मुलेही यावेळी सहभागी झाले. एक बाजूला डॉक्टर, नर्स, पोलीस यंत्रणा लढत आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकरी प्रचंड तोटा सहन करूनही शेती करतो. आपापली जवाबदारी चोख पार पडतो. अन्ननिर्मिती व वितरणाचे काम त्याने थांबवलेले नाही. म्हणून शेतकरी हा अन्नदाता योद्धा आहे. त्याचा सन्मान केला पाहिजे, अशी अपेक्षा अनेकांनी यावेळी व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सुद्धा चिंचखेड येथे अंगणात ट्रॅक्टर व इतर शेती अवजारांसोबत किसान सन्मान दिन साजरा केला.