नाशिक (त्र्यंबकेश्वर): ज्योतिर्लिंग मंदिर परिसर येथून पुढे संदल दरम्यान धुपारती दाखवणे बंद करण्यात येणार असल्याचे गुलाबशहा दर्ग्याचे संदल प्रमुख सलीम सय्यद यांनी ग्रामसभेत स्पष्ट केले. तसेच वाद निर्माण न करता समाजात एकतेचे दर्शन घडवावे, पर्यटकांचा विचार करत शांतता प्रस्थापित करावी. बाहेरच्या संघटनांनी या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
'त्यामुळे' त्र्यंबकेश्वरची प्रतिमा मलिन: त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या हॉलमध्ये सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ, मंदिराच्या विश्वस्तांकडून आज (मंगळवारी) ग्रामसभा घेण्यात आली. घटना घडली त्याच दिवशी हा वाद मिटायला हवा होता, असे सर्वांचे म्हणणे होते; मात्र दोन दिवसानंतर मंदिरात धूप दाखवण्यावरून विशिष्ट समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर हिंदू संघटनांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायऱ्यांचे गोमूत्र, चारधामच्या पाण्याने शुद्धीकरण केले. त्यामुळे देशभरातील प्रसार माध्यमाने या घटनेचे वृत्तांकन केल्याने त्र्यंबकेश्वरची प्रतिमा मलिन झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नाहीतर मंदिरे बंद ठेवू: इतर धर्मियांकडून मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार 'सीसीटीव्ही'त कैद झाला आहे. 72 तासात त्या व्यक्तींवर कारवाई झाली नाही तर राज्यातील मंदिरे बंद ठेवत निषेध नोंदवणार असल्याचे हिंदू महासभेचे आनंद दिवे यांनी म्हटले आहे.
अन्यथा नौटंकी बंद करावी: सर्व मुस्लिम बांधवांकडे भाईचार्याच्या निमित्ताने मागणी करू इच्छितो की, आपण सर्व मशिदींमध्ये हनुमान चालीसा पठण करून द्यावे. असे होत असेल तरच भाईचाऱ्यांच्या गोष्टी कराव्या; नाहीतर ही नौटंकी बंद करावी, असे मत अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.
काय आहे प्रकरण? त्र्यंबकेश्वर येथे 13 मे रोजी रात्री ही घटना घडली होती. दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून त्र्यंबकेश्वर शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात थांबली. देवाला धूप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला; मात्र पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदू धर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा: