नाशिक - नाशिक मतदारसंघात खासदार कधीच रिपीट होत नाही, असा गेल्या पन्नास वर्षापासूनचा इतिहास आहे. मात्र, हा इतिहास शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी मोडीत काढला. दुसऱ्यांदा खासदार म्हणून त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून मतदारांनी भरघोस मतदान केल्याचे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.
नाशिकमध्ये निवडणूक काळात शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे, आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्यात चौरंगी लढत होती. मात्र, मतदानाच्या दिवशी शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आणि खासदार समीर भुजबळ यांच्यात दुरंगी लढत झाल्याचे चित्र होते. नाशिकमध्ये खासदार रिपीट होत नाही असे म्हटले जायचे. मात्र, हेमंत गोडसे यांनी मागील निवडणुकीपेक्षा सर्वाधिक मताधिक्य घेत हा इतिहास मोडीत काढला आहे. तब्बल अडीच लाखाहून अधिक मतदानाची आघाडी घेत त्यांनी विजय संपादित केला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ हे दुसऱ्या स्थानी राहिले, तर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना तिसर्या स्थानावर समाधानमानावे लागले. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच हेमंत गोडसे यांनी आघाडी घेतली होती. सुरुवाती पासून प्रत्येक फेरीमध्ये त्यांनी पाच ते दहा हजार मतांची आघाडी घेत शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली. 2014 च्या निवडणुकीमध्ये पावणे दोन लाख मतांनी आघाडी घेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा गोडसे यांनी पराभव केला होता. यंदा छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा तब्बल अडीच लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून पराभव केला आहे. नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी जितक्या ताकदीने शिवसेना मैदानात उतरली होती, त्याहून ही किंबहुना जास्त भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी प्रचार केला होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी मला पुन्हा संधी दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे. पुढील पाच वर्षात नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास त्यांनी देखील नाशिककरांना दिला आहे.