नाशिक: नाशिक शहरात 1 डिसेंबर पासून पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीची कारवाई केली जाणार आहे. नाशिक शहरात हेल्मेट न वापरल्यामुळे८३ मोटरसायकल स्वरांचा मृत्यू झाला असून २६१ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचं पोलीस अहवालात समोर आल्यानंतर पोलिसांनी आता नाशिक शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 डिसेंबर पासून शहरात ठीक ठिकाणी नाकाबंदी करून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वरांवर कारवाई केली जाणार आहे.
२६१ दुचाकीस्वार गंभीर जखमी: शहरात नाेव्हेंबर २०२२ अखेर हेल्मेट न वापरल्यामुळे ८३ मोटार सायकलस्वारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 1 डिसेंबरपासून दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट परिधान करणे अत्यावश्यक केले आहे. जे वाहनचालक हेल्मेट घालणार नाहीत. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा अधिनियमान्वये कठाेर कारवाई करुन ती अधिक तीव्र केली जाणार आहे. शहरात झालेल्या गंभीर अपघातामध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले आहेत.
हेल्मेट सक्ती नावापुरतीच: विशेष म्हणजे तत्कालिन पाेलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी मागीलवर्षी शहरात हेल्मेट सक्ती केली हाेती. या निर्णयाला बराच विराेध झाला हाेता. मात्र, चालकांनी हेल्मेटची सवय लावून घेतल्याने बऱ्याच अंशी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाले हाेते. त्यानंतर पांडेय यांची बदली झाल्याने हेल्मेट सक्ती नावापुरतीच राहिली. त्यानंतर अपघात वाढून मृत्यही वाढले. त्यासाठी उपाययाेजना सुरु झाले. मात्र, त्याचा जादा परिणाम हाेत नसल्याचे आकडेवारीतून समाेर आल्याने पाेलिस आयुक्त नाईकनवरे यांनी चालकांनी हेल्नेट वापरावेच, असे आव्हान केले आहे.
या कारणांमुळे अपघात: दुचाकी वाहन चालवित असतांना हेल्मेटचा वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम १९८८, कलम १२९/१७७ नुसार बंधनकारक, हेल्मेट न वापरता वाहन चालविल्यास ५०० रुपये दंडाची तरतूद, कायदेशीर बाबी परंतु हेल्मेट वापरणे हे वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे, हेल्मेट वापरतानाही दुर्देवाने अपघात झालाच तर डोक्याला व चेह-याला गंभीर इजा होत नाही. तसेच जिवितहानी देखील होत नाही हे निष्पन्न झाले आहे. रस्त्यावर पडून तसेच डाेक्याला मार लागून मृत्यू, पाेलिसांनी प्राणांतिक अपघातांच्या कारणांचे विश्लेषण केले असता, त्याच बरेच दुचाकीस्वार अपघात झाल्यानंतर रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले किंवा रस्त्यावर डोके आदळून मृत्यू पावले आहेत.
या हाेत्या उपाययाेजना: शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर पोलीसांनी राष्ट्रीय महामार्ग ३ वर गस्त वाढविली असता अपघातांमध्ये ब-यापैकी घट झाल्याचे दिसून आले आहे. वाढविलेल्या गस्तीमुळे काही वाहन चालकांचा जीव वाचलेला आहे. कोणाचा जीव वाचला हे अर्थातच समजून आलेले नाही. यापूर्वी देखील हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. त्यावेळी अपघाताच्या संख्येमध्ये, प्राणांतिक अपघातामध्ये व गंभीर दुखापतीमध्ये घट झाल्याचे आढळून आलेले आहे.
अन्यथा कठोर कारवाई: गेल्या 6-7 महिन्यांपासून नाशिककरांच्या स्वभावाचे निरीक्षण केले आहे. या शहरातील नागरिक कायदा व सुव्यवस्थेचे स्वंयस्फूर्तीने पालन करतात. त्यामुळे सुजान नागरिकांना सक्ती करण्याची आवश्यकता पडत नाही. तथापि दुचाकीस्वारांचे होणारे अपघात व त्यामध्ये होणारी प्राणहानी, गंभीर जखमा व त्यामुळे येणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणा-यांविरुध्द पोलीसांना नाईलाजास्तव कडक कारवाई करणे क्रमप्राप्त ठरते. सर्व दुचाकीस्वारांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरुन वाहतूक नियमांचे पालन करावे असे आव्हान पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले आहे.