नाशिक - येवला येथे वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे अनेक कांदा व्यापाऱ्यांचे शेड पडून हजारो क्विंटल कांदा भिजला आहे. तसेच येवला-कोपरगाव महामार्गावर रस्त्यात झाड पडल्याने दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
ग्रामीण भागात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील रेंडाळे गावात सात ते आठ घरांचे पत्रे उडाले असून येवला येथील शेतकरी कचरू राऊत यांच्या अंगावर त्यांच्या स्वतःच्या घरावरचे पत्रे पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.
अचानक आलेल्या पावसामुळे मनमाड, चांदवड, येवला, नांदगाव येथील शेतकऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिकसह ग्रामीण भागात उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.