नाशिक - गेल्या आठवड्याभरापासून दिल्ली आणि पंजाब येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. दिल्लीच्या वेशीवर हे आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा फटका आता नाशिक जिल्ह्याला देखील बसत आहे. या आंदोलनामुळे नाशिक जिल्ह्याला रेशनसाठी पुरवठा केला जाणारा गहू आणि तांदळाचा साठा अडकून पडल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यांना धान्यपुरवठा होऊ शकला नाही.
रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित
जिल्ह्यातील रेशन धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली असून हजारो रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित आहेत. शेतकरी आंदोलनाचा वितरण व्यवस्थेवर ३० ते ४० टक्के परिणाम झाला आहे. हा धान्य पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माध्यमांशी बोलत असताना दिली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, पेठसह अनेक तालुक्यात धान्य पोहोचलेच नाही तर नाशिक शहरात देखील रेशन दुकानांवर गहू, तांदळाचा काही ठिकाणी तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेले शेतकरी आंदोलन आणखी लांबल्यास धान्य वितरकांना काही दिवसांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.