नाशिक - कोरोना आणि निर्यातबंदी यानंतर आता कुठे कांद्याला चांगला भाव मिळत असताना आता चोरट्यांची यावर नजर पडली आहे. बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे नासीर पठाण या शेतकऱ्याने चाळीत साठवून ठेवलेला जवळपास आठ क्विंटल कांदा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्याकरता केंद्र सरकारने 'हे' उचलले पाऊल
सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांचा मोर्चा कांदा चोरीकडे वळविला आहे. काही दिवसांपूर्वीच कळवण तालुक्यात कांदा बियाणे चोरीच्या घटना समोर आल्यानंतर आता चोरट्यांनी थेट कांदा चोरी करायला सुरुवात केली आहे. अशीच एक घटना बागलाणच्या जायखेडा येथे घडली आहे. नासीर पठाण यांनी चाळीत साठवून ठेवलेला जवळपास 8 क्विंटल कांदा शनिवारी चोरट्यांनी चोरून नेला आहे. यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे कांदा चाळींपासून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असतानाही चोरट्यांनी धाडस करून कांदे चोरून नेले आहेत. यामुळे या शेतकऱ्याला हजारो रुपयांचा फटका बसला आहे.
हेही वाचा - विजयादशमी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झेंडूची आरास