मनमाड (नाशिक) - लग्नानंतर सासरी जाणाऱ्या वधुने आपल्या वडिलांच्या शेतात पेरणी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार वडिलांनी तिची इच्छा पूर्ण केली. यानुसार वधूमुलीसोबत वरमुलाने तिला मदत करत शेतात भुईमूगाची पेरणी केली आहे.
माहेर म्हटले की सासुरवाशीण महिलेला ती पर्वणीच असते. माहेरच्या लोकांसाठी किती करू आणि काय करू मग ते आई-वडील असो वा आजी-आजोबा किंवा भाऊ बहीण असोत. त्यांच्यासाठी मुलगी हे कायम तत्पर असणार नाते आहे आणि जेव्हा ती लग्न करून सासरी जाते तेव्हा सर्वांत जास्त दुःख देखील वडिलांनाच होत.
सध्या पावसाळ्यात शेतीचे काम सुरू आहेत. त्यात लॉकडाऊन सुरू लग्नसोहळा तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. अशा परिस्थितीत मनमाडजवळ मंगळूर येथे गुरूवारी एक विवाह सोहळा पार पडला. मात्र, लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे, लग्न सोहळा उरकला तोच नववधुने आपल्या नवऱ्याकडे एक मागणी केली. ती मागणी म्हणजे, मी आता माहेरी आले तरी मला माझे घरचे लोक शेतीत काम करू देणार नाही. मी पाहुणी म्हणून येईल आणि पाहुणी म्हणून जाईल. मात्र, लग्नाच्या गडबडीत वडिलांचे शेतीचे बरेच काम बाकी राहिले आहे. तर मी पेरणी करू का? त्यावर शेतकरी कुटुंबातील संदीप याने त्वरित होकार दिला. एवढेच नव्हे तर मीही जोडीला येतो, असे म्हणत नवदाम्पत्याने भुईमुग पेरणी केली.
आम्ही दोघेही उच्चशिक्षित असलो तरी शेतकरी कुटुंबातील आहोत. त्यामुळे आम्ही नोकरी न करता यापुढे प्रगत शेती व्यवसाय करून आमची परंपरा पुढे सुरू ठेऊ, असे प्रतिक्रिया नवदाम्पत्याने दिली आहे. तसेच माझी सून ही शेतकऱ्यांचीच मुलगी असल्याने आणि लग्नसोहळा उतकताच तिने वडिलांना जी मदत करण्याच्या उद्देशाने पेरणी केली त्याचा मला अभिमान आहे. आम्ही देखील शेतकरी आहोत तिला आमच्या घरीदेखील माहेरसारखेच प्रेम देऊ, असे विश्वास वरपिता वडील बाळू एळीजे यांनी व्यक्त केला आहे.