नाशिक - भाजप महिला मोर्च्याच्या पदाधिकार्यांनी राज्यभर केलेल्या आंदोलनाला यश आले असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अर्धी लढाई जिंकली असून राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी केली आहे.
राठोड यांनी दिलेल्या राजीनाम्याचे भाजप महिला मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले. परंतु, ही लढाई अजून संपलेली नसून पुढे लढाई सुरू राहील, अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी दिली. नाशिकमध्ये पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात रविवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही मागणी केली आहे. संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्येचा आरोप असून भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यास यश आले असून पन्नास टक्के लढाई जिंकली आहे.
मुख्यमंत्री उशिराने का होईना जागे झाले..
मुख्यमंत्री ठाकरे उशिराने का होईना जागे झाले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद, त्यांनी असेच जागे रहावे. राठोड यांचा नुसता राजीनामा नको तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे. पूजा चव्हाणला न्याय मिळेल तेव्हा खर्या अर्थाने आंनदोत्सव साजरा करू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी सांगितले आहे.
अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करावी..
१९ दिवसानंतर राठोड यांच्यावर कारवाई झाली असून ऐवढ्यावरच न थांबता या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी भाजप मोर्चा सरचिटणीस दिपाली मोकाशी यांनी केली आहे. राठोड यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यापुढे त्यांची अटक करून पुढील कायदेशीर कारवाईनंतर पूजा चव्हाणला खरा न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.