नाशिक - नाशिकचे मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, यावरून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गिते यांचा चांगलाच समाचार घेतला. गिते यांनी केलेल्या एका वक्तव्याला नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
वसंत गिते हे भाजपमध्ये खूश नव्हते ही बाब लक्षात घेऊन, मनसेच्या नाशिकमधील नेत्यांनी गिते यांची भेट घेतली होती, आणि त्यांना मनसेत परतण्याची विनंती करण्यात आली. मात्र मी ज्या तीन व्यक्तींमुळे मनसे सोडली त्यांच्याबरोबर पुन्हा का काम करावे असा सवाल यावेळी गिते यांनी उपस्थित केला होता. यावेळी गिते यांचा रोख हा बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर यांच्याकडे होता. गिते यांच्या या खोचक सवालाला बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले नांदगावकर?
2 दिवसांपूर्वी नाशिक येथील काही "अतिशय मोठे" नेते बोलले की नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे तेच "मोठे नेते" आहेत ज्यांनी मनसेची चलती असतांना सेना सोडली, भाजपची सत्ता असताना मनसे सोडली, सेनेची सत्ता असताना परत भाजप सोडली. एवढ्या "निष्ठावंत" नेत्यांवर काय बोलणार. यांचे 'जिथे भेळ तिथे खेळ' अशा प्रकारचे राजकारण त्यांचे त्यांनाच लखलाभ असो. शक्यतो वैयक्तिक शेरेबाजी करणे राजकीय जीवनात कायमच टाळत आलो, परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहत नाहीत म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते. त्यांना खुप शुभेच्छा व एकच मैत्रीपूर्ण सल्ला आता तरी गेल्या घरी सुखी राहा. आपला नम्र बाळा नांदगावकर अशा शब्दात बाळा नांदगावकर यांनी गितेंचा समाचार घेतला आहे.