नाशिक - लॉकडाऊनमुळे विविध राज्यात नागरिक अडकले आहेत. त्यांना आपआपल्या राज्यात जाण्याची परवानगी सरकारने दिली आहे. त्यानुसार मंगळवारी पंजाबच्या लव्हली विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नाशकात आणण्यात आले. या विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
लॉकडाऊनमुळे पंजाबच्या लव्हली विद्यापीठात महाराष्ट्रातील १६५ विद्यार्थी अडकलेले होते. वैद्यकीय, कृषी, मॅनजमेंट, पीएचडी व इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंजबावरून नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव येथे १२० विद्यार्थ्यांना आणण्यात आले. त्यांची नॉलेज सिटीच्या वसतिगृहात रात्रभर राहण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी नाश्ता देऊन १० वाजण्याच्या सुमारास भुजबळ नॉलेज सिटीमधून सहा बसेसने राज्यातील विविध भागात सुखरूप पाठविण्यात आले. यावेळी बसेसमध्ये विद्यार्थ्यासाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच बसेस निर्जंतुकीकरण केल्या होत्या.
दरम्यान, बुधवारी रात्री ४५ विद्यार्थी दोन बसेसमधून भुजबळ नॉलेज सिटी येथे पोहोचणार आहेत. त्यानंतर त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचविण्यात येणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश -
- नागपूर-वर्धा-अकोला-बुलडाणा १६
- औरंगाबाद-जालना-परभणी-लातूर १६
- पुणे-२२
- मुंबई-ठाणे-पालघर-रायगड १५
- अनगर-बीड-उस्मानाबाद-सोलापूर २४
- सातारा-सांगली-कोल्हापूर-रत्नागिरी १५
- नाशिक, धुळे १२
आजवर ज्या गोष्टींना कधी सामोरे जाण्याची वेळ आली नाही, ती वेळ आज आपल्यावर आली आहे. या महामारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. परंतु, या संकटावर एकमेकांच्या मदतीने आपण मात करू शकतो. आज नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक समीर भुजबळ यांनी विद्यार्थ्यांची उत्तम व्यवस्था भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून केली, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले. त्याबद्दल त्यांनी भुजबळांचे आभार देखील मानले.