नांदेड - कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षणाचा बोलबाला झालाय. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेटच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्याचे मोठे हाल होतायेत. अनेक विद्यार्थ्यांना नेटवर्कसाठी जीवघेण्या कसरती कराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील अनेक वाडी तांड्यावर कुठल्याही नेटवर्कची सेवा नीट चालत नाही. अशात आम्ही शिक्षण कसे घ्यायचे असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पडला आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आणि सगळे ठप्प झाले. त्याचा फटका सर्वानांच बसला. त्यापासून शिक्षणक्षेत्र देखील सुटलं नाही. जुलै महिना शेवटच्या टप्प्यात आहे तरी देखील शाळा सुरू झाल्या नाहीयेत. शाळा कधी सुरू होतील याबद्दल शिक्षण विभाग देखील संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळं शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक खासगी शिकवण्या आणि इंग्रजी माध्यमाच्या ऑनलाईन शिक्षणाकडे कल दिला आहे. ग्रामीण भागात इंटरनेटच्या सुविधा नसल्यामुळं विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना नेटवर्कसाठी मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. त्यासाठी विद्यार्थी झाडावर तर कोणी घराच्या छतावर इंटरनेट शेधताना दिसत आहेत. जिथे नेटवर्क मिळेल तिथून विद्यार्थी कसाबसा अभ्यास करतायेत.
विद्यार्थ्याची ऑनलाईन शिक्षणाची ही कसरत जीवावर बेतणारी इतकी अवघड बनलीय. मात्र, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थी ही कसरत करतायेत. ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूर वर्गाला ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा खर्च देखील परवडणारा नाहीये. मोबाईल आणि रिचार्जसाठी दर महिन्याला लागणारा खर्च मोठा आहे. अशा परिस्थितीत देखील सरकारने आधी इंटरनेटची जोडणी करावी, त्या नंतरच ऑनलाईन शिक्षणाची सक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करतायेत.