नांदेड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २ लाख ६८ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने बँकांकडे पीककर्जाची मागणी केली होती. त्यानंतर फक्त जिल्हा बँकेने कर्जवाटपाचे उद्दिष्ट पार केले असून इतर बँकांची कर्जवाटपाची गती मंद आहे. जिल्ह्यात केवळ २५ टक्केच कर्जवाटप झाले आहे. तसेच, अनेक बँका कर्जावाटपासाठी शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे, शेतकरी राजा हैराण झाला आहे.
जिल्हा बँकेला १८५ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपयांचे उद्दिष्ट असून बँकेने ५५ हजार १७५ शेतकऱ्यांना २६० कोटी ९१ लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. व्यापारी बँकांना १ हजार ५५७ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपयांचे उद्दिंष्ट असून व्यापारी आणि खाजगी बँकांनी फक्त १३ हजार ८१८ शेतकऱ्यांना १३५ कोटी ९२ लाख ६९ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २८८ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट असून बँकेने फक्त १८ हजार ५७० शेतकऱ्यांना ११९ कोटी ३४ लाख ४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. यावरून जिल्हा बँक सोडता इतर बँकांचा कर्ज वाटपाचा वेग मंद असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात ७ हजार २९६ शेतकऱ्यांना १०५ कोटी ५१ लाख ३६ हजार रुपये एवढे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
ऑनलाइन मागणी अर्ज केलेल्यांपैकी १ लाख ८० हजार ४३७ शेतकरी कर्ज मिळण्याची वाट बघत आहेत. शेतकऱ्यांकडे पीक कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशास बँकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. या प्रकारामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तलाठी, अन्य बँकांमध्ये शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे, त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांकडून बँकांच्या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
बँकनिहाय पीक कर्जवाटप
१) जिल्हा बँक- १४०.४७ टक्के
२) राष्ट्रीयकृत व्यापारी, खाजगी बँका- ८.७३ टक्के
३) महाराष्ट्र ग्रामीण बँक- ४१.४० टक्के
हेही वाचा- ८२ वर्षीच्या भाविकाने केली अमृतसर ते नांदेड सायकल यात्रा