नांदेड - केंद्र शासनाने पावसाळी अधिवेशनात घाईमध्ये काही शेतकरी विधेयकं मंजूर करून त्यांचे कायद्यात रुपांतर केले. या कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरियाणा सह विविध राज्यातील शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. लाखो संतप्त शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिंधू सीमेवर धडक दिली आहे. या आंदोलनकर्त्यांना सीमेवरच अडवण्यात आले असून त्यांना रोखण्यासाठी शासनाने अमाणूषणा केला आहे. तरीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेड येथील सचखंड गुरुद्वारामध्ये गुरुनानक जयंतीपासून अखंड पाठ सुरू आहे.
आंदोलक शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध -
राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहे. त्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या आंदोलनकर्त्यांना खलिस्तानी व दहशतवादी म्हणून संबोधले जात आहे. त्यांच्यावर पाण्याचे फवारे व अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. या सर्व घटनेचा गुरुद्वारा प्रशासनाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
पंचप्यारे यांच्या आदेशान्वये गुरुद्वारात अखंड पाठ -
शीख समाजाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नांदेड येथील हुजुरसाहिब सचखंड गुरुद्वाराला विशेष महत्व आहे. पंजाबमधील भाविक मोठ्या संख्येने नांदेडला येत असतात. सध्या देशातील शेतकरी संकटात आहे. देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी गुरुद्वारा बोर्ड आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी पंचप्यारे यांच्या आदेशानुसार ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान अखंड पाठ सुरू आहे. येणाऱ्या काळात गुरुद्वारा बोर्डाकडून आंदोलनकर्त्यांना मदत पाठवण्याचे नियोजन केले जात असल्याचे गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्र सिंग बुंगई यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सोडवण्याची गृहमंत्र्यांना विनंती - कॅप्टन अमरिंदर सिंग
शेतकरी नेत्यांचे ४० सदस्यीय शिष्टमंडळ आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बैठक सुरू आहे. यामध्ये माझी काहीही भूमिका नाही. कृषी कायद्यांना माझा विरोध आहे. माझा हा निर्णय मी केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची त्यांना विनंती केली आहे. माझे राज्य, देशाची अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या सर्वांवर हे आंदोलन परिणाम करणारे आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.