नांदेड- देगलूर, मुखेड, उमरीसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा आणि दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. यासाठी गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांकडून 'पीकविमा व दुष्काळ निवारणासाठी मोर्चे, आंदोलन व रास्ता रोको करण्यात येत आहेत. तरी देखील प्रशासनाने ठोस पावले उचलले नाही. त्यामुळे आक्रमक व अस्वस्थ शेतकरी व तरुणांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन लिहून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा नक्षलवादी होण्याची अनुमती द्या, अशी मागणी केली आहे.
या निवेदनाद्वारे उंबरठा उत्पन्नाची जाचक अट तात्काळ रद्द करून खरीप २०१८ चा पीकविमा मंजूर करा, दुष्काळ मदत निधी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, चारा छावण्या लावण्यास असमर्थ ठरलेल्या शासनाने अनुदानाची रक्कम पशूपालक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा व चुकीच्या शेती धोरणांमुळे सध्याची शेती परवडत नसल्याने अफीम व गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा रूमणे व लेखणी हातात घेणाऱ्या शेतकऱ्यांना व तरुणांना नाईलाजास्तव शस्त्रे हातात घ्यावी लागतील, असा धमकीवजा इशारा या आंदोलनाचे निमंत्रक कैलास येसगे कावळगावकर यांनी यावेळी दिला आहे.
या निवेदनावर कैलास येसगे, विवेक पडकंठवार, गंगाधर आऊलवार, जगदीश कर्हाडे, जावेद अहमद, मलरेड्डी यालावार, महेशआप्पा माळगे, गजानन पाटील, संजय पाटील चिटमोगरे, उत्तमराव वाडीकर, विठ्ठल वनंजे, माधव लगडे, पांडूरंग पिटलेवाड व महादप्पा पंचडे या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.