नागपूर - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्या कारणाने सर्वच नागरिक स्वछता व आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी ग्रामपंचायततर्फे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीत माकड पडून मृत झाले होते. त्यानंतर देखील त्याच टाकीतून काही दिवस दूषित पाणीपुरवठा झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पाटणसावंगी गावात खळबळ उडाली आहे.
संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीत मृत माकड आढळल्याची खळबळजनक घटना गावात घडली आहे. सकाळी दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी नळाद्वारे आल्याने काही नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केली. पाण्याच्या टाकीची तपासणी केली असता, पाण्याच्या टाकीत मृत माकड पडलेलं असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने कोणालाही न कळता गुप्त पद्धतीने टाकीतून मृत माकडाची विल्हेवाट लावण्यात आली तर पाण्याच्या टाकीचे तात्काळ शुद्धीकरण सुद्धा करण्यात आले. या घटनेची माहिती हळूहळू संपूर्ण गावात पसरली. ज्यामुळे आरोग्याच्या चिंतेने लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन रोष व्यक्त केला.