नागपूर - दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा विकास हे आपले प्रथम उद्दिष्ट आहे. गडचिरोलीचा पालकमंत्री होतो तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा आहे. त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसून मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आज मंगळवार (दि. 25 ऑक्टोबर)रोजी भामरागड येथे आनंदाने दिवाळी साजरी केली असे प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
पोलीस जवानांना साहित्य वाटप - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा धोडराज पोलीस मदत केंद्राच्या आवारात आदिवासी नागरिक आणि पोलीस जवानांना साहित्य, फटाके आणि फराळ वाटप करून त्यांच्यासोबत संवाद साधत दिवाळी साजरी केली. नागपूर विमानतळावरून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने थेट धोडराज येथे पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे आदींनी त्यांचे स्वागत केले.
विविध समस्यांचीही मला जाणीव आहे - नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलवाद्यांमुळे विकासात्मक कामांत अडथळे येत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद संपवणे गरजेचे आहे. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही दुर्गम भागात येत होतो. त्यामुळे तुमच्याबद्दल मला आस्था आहे. तुमच्या विविध समस्यांचीही मला जाणीव आहे. त्या दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नक्षलवाद ही समस्या - दिवाळीसारख्या सणाला आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या, आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करणे समाधानाची बाब आहे. पालकमंत्री असताना दिवाळी पोलिसांसोबत साजरी करीत होतो. आता हळूहळू गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपत असल्याचा आनंद असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. पोलिसांनी गडचिरोलीतील नक्षलवादांचा बीमोड केलेला आहे. मात्र, शहरही नक्षलवाद ही समस्या असून याकडे सरकार गांभीर्याने लक्ष घालत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नाना पटोलेंचे वक्तव्य हास्यासपद - नाना पटोले यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. पटोलेंची मागणी हास्यास्पद आहे. कारण आज राज्यात बहुमताचे, भक्कम पाठींबा असलेले सरकार स्थापन झाले आहे. तीन महिन्यांत आम्ही ७२ मोठे निर्णय घेतले. ग्रामपंचायत निवडणूकीत भापजप ३९७ जागांवर तर आमच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने २४३ ग्रामपंचायतींवीर सरपंच निवडून आणले आहे. आताही इतर सरपंच येऊन भेटत आहेत. आकडा वाढतो आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. विरोधी पक्ष टिका करतात, ते त्यांचे कामच आहे. पण आम्ही टिकेला टिकेने नव्हे तर कामाने उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांना मदत मिळेल - परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसान भरपाईसाठी हेक्टरची मर्यादा वाढवली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.