नागपूर - जोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणूका घेऊ नका, अशी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. मंगळवारी सर्वोच्च ओबीसी आरक्षण संदर्भातील सुनावणी आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ( Nana Patole on OBC Reservation )
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाचे स्पष्ट मत आहे की जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने हीच भूमिका मांडली जाणार आहे. आम्हाला अपेक्षित आहे की ओबीसींच राजकीय आरक्षण कायम ठेवूनच या निवडणुका व्हाव्यात. या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं असल्याचं त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने उद्याच्या सुनावणीसाठी चांगले वकील नेमलेले आहेत. राज्य सरकारची ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम राहावा यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला कमी निधी दिला असला तरी गरजेप्रमाणे टप्प्याटप्प्याने निधी देता येईल, संपूर्ण निधी एकदाच दिला म्हणजे सर्व डेटा गोळा होईल, असा त्याचा अर्थ होत नाही, असं त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय करायचे हा त्या दोन्ही पक्षांचा प्रश्न आहे. आम्हाला त्यात जायचं नाही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील आमच्या भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.
निवडणुकीवर बहिष्कार लोकशाहीसाठी घातक -
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने अनेक ठिकाणी ओबीसी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरसकट रद्द करण्यात यावा, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.
हेही वाचा - NCP Slams PM : 'गंगाने बुलाया है' म्हणणार्या पंतप्रधानांनी अजून गंगा स्वच्छ केली नाही - नवाब मलिक
भाजपने नेमले वकील -
भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मोठमोठे वकील नेमले आहेत. आम्हाला आता या विषयात त्यात जायचं नाही. फक्त ओबीसींच्या राजकीय आरक्षण शिवाय निवडणुका होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न विधानसभेत उचलू -
एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न काँग्रेस पक्ष येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात उचलणार आहे. राज ठाकरेंनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, राज्य सरकारने यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. यामागे राजकारण आहे हे कोणापासूनही लपलेलं नाही. एसटी सामान्य गरीब माणसासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हे महामंडळ जिवंत राहिले पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका असून विधिमंडळात आम्ही ते मांडू, असेही नाना यावेळी म्हणाले.
बावनकुळेंना टोला -
नाना पटोले दबावात येत नाही तर दबावात आणतो आणि या संदर्भात जे काही आरोप माझ्यावर करत आहेत. ते ज्यांना आपला बाप समजतात त्या बापाशी लढणारा नाना पटोले आहे. माझ्यावर असे आरोप करण्याची त्यांची लायकी नाही. ते डोक्यावर पडले असून त्यांचा वरचा मजला रिकामा आहे, असे म्हणत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली. नागपूरची विधानपरिषद निवडणूक स्ट्रॅटेजीचा भाग आहे, असे त्यांनी सांगितले.