मुंबई - राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. १ एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे १००० रुग्णालयांचा समावेश होणार असल्याने त्यामध्ये कोरोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकणार असल्याचेही टोपे म्हणाले.
या निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे 2 हजार व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार असल्याचे टोपे म्हणाले. कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देत आहे. शुक्रवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री टोपे यांनी या महत्वपूर्ण निणर्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना अनेक दीर्घ व उपचाराचा खर्च न परवडणाऱ्या आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. सध्या या योजनेत राज्यभरातील ४९२ खासगी रुग्णालये सहभागी असून, येत्या १ एप्रिलपासून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन १००० रुग्णालयांचा समावेश होईल.
राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अनेकविध उपाययोजनांपैकी या योजनेमध्ये सहभागी असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचाराची सुविधा जनआरोग्य योजनेंतर्गत केली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी पात्रतेच्या अटी कोरोनाबाधीत रुग्णांसाठी शिथील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त कुठलाही रुग्ण योजनेंतर्गत सहभागी रुग्णालयात उपचार घेऊ शकेल. योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांच्या सहभागाची संख्या वाढणार असल्याने कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास किमान २ हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध होवू शकतात. त्याचबरोबर सुमारे एक लाख खाटाही यामाध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी संगितले.