मुंबई - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मागील २० महिन्यांपासून शासनाकडे ३३ मागण्या केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाविरोधात पावसाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी काळ्या फिती लावून राज्यभरातील शिक्षकांनी निषेध आंदोलन केले. जे शिक्षक घरी अध्यापन करत आहेत, त्यांनी घरातून काळी फित लावून आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.
राज्य स्तरावर तीव्र स्वरुपाचे आंदोलन-
शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांनी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षणनिरीक्षक, उपसंचालक यांना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच या मागण्या शासनाकडे पाठवण्याची विनंती केली. विभाग स्तरावर सातही विभागात शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले. तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना ही आमदार नागो गाणार, वेणूनाथ कडू, शिवनाथ दराडे, भाऊसाहेब घाडगे यांनी निवेदन दिले आहे. शासनाने या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास राज्य स्तरावर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाच्या निमित्ताने देण्यात आलेले आहे.
काय आहेत मागण्या..?
राज्याच्या शिक्षकांच्या काही निवडक मागण्यांमध्ये, जुनी पेंशन योजना लागू करून भविष्य निर्वाह निधी योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे. १०, २०, ३० ही आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना लागू करणे, ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला व दुसरा हफ्ता तात्काळ देणे, शिक्षकेत्तरांच्या पद भरतीबाबतचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे भरती करण्यात यावी. कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विशेष रजा मंजूर करणे. कोरोनामुळे मृत कर्मचार्यांच्या वारसदारांना अनुकंपा योजना लागू करणे. अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करणे, कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे. डी.सी.पी.एस. धारकांना पावत्या देण्यात याव्यात. क्रीडा विभाग अनुदानातील भ्रष्टाचार बंद करण्यात यावा. संस्थेअंतर्गत वाद असणारी पदोन्नतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना देणे. आभासी पद्धतीच्या शिक्षण प्रणालीमध्ये एकसुत्रता यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. अशा ३३ मागण्या शासनाकडे मांडल्या असून त्याची तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा, राज्यभरात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शासनाला दिला आहे.
घरीच काळ्या फिती लावून शिक्षकांनी केला निषेध -
मुंबईमध्ये वर्क फ्रॉम होम असल्याने घरीच काळ्या फिती लावून शिक्षक, शिक्षकेतर निषेध व्यक्त केला आहे. याबरोबरच निकालाच्या कामासाठी जाणारे शिक्षक शाळेत काळ्या फिती लावून सोमवारी दिवसभर ते काम करत होते. तसेच, पदाधिकारी, शिक्षण निरीक्षक उत्तर, दक्षिण, पश्चिम विभाग यांना शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.