मुंबई - कोरोनामुळे यावर्षी बालभारतीची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नव्हती. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तके वितरण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
काम पुर्ण करण्यासाच्या सूचना -
पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तकांची वाहतूक करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियाद्वारा मुंबईतील शिरीष कार्गो सर्विस प्रा. लिमिटेड कंपनीला वाहतूकदार म्हणून नियुक्त केले आहे. बालभारती भांडार ते शाळेपर्यंत पुस्तके वितरण करून ती पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी व कालमर्यादेत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पाऊस, वारा अथवा नैसर्गिक आपत्ती यामुळे पुस्तके खराब होणार नाहीत यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा - मुक्त विद्यापीठ ते लंडन : 45 लाखांची स्कॉलरशिप मिळवणारा शेतकरी पुत्र; वाचा, राजू केंद्रेचा प्रवास...
गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या -
राज्यातील प्राथमिक शिक्षण अधिकार्यांनी प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधींनी बालभारतीच्या भांडारामध्ये न जाता योग्य ते नियोजन करून व समन्वय साधून पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यवाही करण्यास सांगितले आहे. शालेय स्तरावर पुस्तके प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांनी पाठ्यपुस्तके केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी. वितरित केलेल्या पुस्तकांच्या सर्व नोंदी ठेवणे आवश्यक आहे. पुस्तके वितरित करत असताना कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.