मुंबई - कोरोना काळात स्वतःच्या जीवाची काळजी न करता देशभरातील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणासह कोविड ड्युटी बजावली आहे. कर्तव्यावर असताना अनेक शिक्षकांचा मृत्यूदेखील झालेला आहे, अशा परिस्थितीत देशातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने या कोरोनाकाळात सुद्धा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले आहे. मात्र, राज्य सरकारने आतापर्यत राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांला स्थगिती दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे पुरस्कार जाहीर करावे, अशी मागणी शिक्षकांच्यावतीने करण्यात आली आहे.
पुरस्कारांपासून राज्यातील शिक्षक वंचित -
कोरोनाच्या काळात सुद्धा केंद्र सरकारने मागील वर्षी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले आहेत. यावर्षीही आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. परंतु राज्य सरकारकडून मागील वर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड करण्यात आलेली नाही आणि प्रदानही करण्यात आलेले नाहीत. ही खेदाची गोष्ट आहे. शिक्षकांच्या कार्याची दखल न घेण्यासारखेच आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केली आहे. तसेच कोरोना महामारी असली तरी शिक्षकांकडून मात्र, ऑनलाईन शिक्षण चालूच आहे. नेमून दिलेली सर्व कामे वेळच्यावेळी पूर्ण होत आहेत. शासनाच्या सर्व उपक्रमातही शिक्षकांचा सहभाग आहे. शिक्षकांचे योगदान चालूच आहे. असे असताना शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारांपासून का वंचित ठेवले जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
'शिक्षकांना वाऱ्यावर सोडले'-
यावर्षीही राज्य स्तरावर शिक्षक पुरस्कार देण्याबाबत कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. निवड समिती तसेच निवड प्रक्रियेची कार्यवाहीसुध्दा अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. खरंतर कोरोना काळातही ऑनलाईन अध्यापनासोबतच बीएलओची कामे, कोविड काळात रूग्णालयात मदतनीस, धान्य वाटप करणे, पुस्तके वाटप करणे, बालरक्षक मोहिम राबवणे, अनुषंगिक मुल्यमापनाची सर्व कामे करणे तसेच शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार सर्व कामे पूर्ण करणे, अशी कामे शिक्षक करत आहेत. शिक्षकांना त्यांच्या कार्याची दखल घेणारी, आनंदाची, प्रेरणादायी बाब म्हणजे राज्य पुरस्कार आहे. नेमके त्यापासूनच शिक्षकांना दूर का ठेवले जात आहे? त्यामुळे मागील वर्षीच्या देय असलेल्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड करणे व यावर्षीच्या शिक्षक पुरस्कारांची निवड स्वतंत्रपणे करण्यात यावी, दोन्ही वर्षीच्या पात्र असलेल्या शिक्षकांसाठी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही करता येईल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार तत्काळ घोषित करावी. तसेच प्राप्त शिक्षकांना २ वेतनवाढीचा लाभही तातडीने देण्यात यावा, अशी मागणी आम्ही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - अनलॉकबाबत मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळताच नोटिफिकेशन प्रसिद्ध केले जाईल - वडेट्टीवार