मुंबई - कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. रक्तदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने हे समाज माध्यमाची मदत घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रात स्वयंस्फूर्तीने रक्तदानाचे प्रमाण देशात सर्वाधिक असून रक्त संकलनात महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.
आता राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहे. गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वेळेवर रक्त मिळावे यासाठी सामाजिक संस्थांच्या रक्तदान शिबीरासोबतच फेसबुकच्या रक्तदान टूल या सेवेची मदत घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याबाबत माहिती दिली.
या उपक्रमात राज्यभरातील सुमारे ७१ शासकीय रक्तपेढ्यांची फेसबुकच्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासली तर ती पेढी फेसबुकच्या पेजवर तशी मागणी करेल. त्यानंतर फेसबुकमार्फत संबंधीत रक्तपेढीच्या विभागातील, शहरातील रक्तदात्यांना (ज्यांची आधीच फेसबुकवर नोंदणी झाली आहे) रक्तदानाबाबत संदेश जाईल. तसेच कुठल्या रक्तपेढीत जाऊन कुठल्या गटाचे रक्त द्यायचे, याची माहितीही दिली जाईल. त्यामुळे वेळीच आवश्यक त्या गटाचे रक्त उपलब्ध होऊन रुग्णांचे प्राण वाचू शकतील. फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा वापर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासाठी झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात राज्यातील रक्तसाठा कमी होत होता. गर्दी टाळणे आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी रक्तदान शिबीरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन झाले नाही. जेव्हा रक्तसाठा कमी होऊ लागला तेव्हा राज्यातील जनतेला संबोधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्याला राज्यातील जनतेने प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला.