मुंबई - महाराष्ट्रात कोरोना उपाययोजनांची व्यवस्थित अंमलबजावणी झाली नसल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. हे केवळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्ये कोरोनाचा प्रतिकार करण्यात अपयशी असल्याचा ठपका केंद्रीय पथकांनी ठेवला आहे. या तिनही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. त्यामुळे हे त्या राज्यांचे नाही तर केंद्राचे अपयश आहे, असेही राऊत म्हणाले.
भाजपशासित राज्यांमध्ये कोरोना पळून गेला काय?
जेव्हापासून देशात कोरोनाने शिरकाव केला आहे. तेव्हापासून देशातील सर्व राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली कोरोना विरोधी धोरणाची लढाई लढली आहे. मोदींच्या प्रत्येक सूचनेचे पालन राज्य सरकार करत आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही तेच कसे अपयशी ठरले? असा प्रश्न मला पडला असल्याचे संजय राऊत म्हणाले. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तिथे कोरोना काय पळून गेला का ? असा टोलाही राऊतांनी लगावला.
केंद्राने खच्चीकरण करू नये -
'प्राण जाये पर वचन न जाये' अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारने कोरोनाविरोधी मोहीम राबवली. महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतरित मजूर आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून मजूर रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात. त्यामुळे संपूर्ण देशाचा भार महाराष्ट्रावर आहे. साहजिकच रूग्ण संख्या देखील जास्त आहे. रूग्णसंख्येला लागणारी औषधे आणि लस देणे हे केंद्राचे कर्तव्य आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. गुजरातमधील भाजपच्या कार्यालयांमध्ये मात्र, हवे तेवढे रेमडेसीवीर आणि लस मिळत आहेत. आमच्या रूग्णांना लस मिळत नाही, तरी देखील महाराष्ट्र सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत केंद्राने टीका करून खच्चीकरण करू नये, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा - राज्यात 63 हजार 294 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 349 मृत्यू