मुंबई - शिर्डी-पाथरी वादावर आज (सोमवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिर्डीतील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिर्डी ग्रामस्थांचे समाधान झाले आहे. तसेच शिर्डीकरांनी जे आंदोलन पुकारले होते ते मागे घेण्यात आल्याची माहिती भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले आहे. तसेच तिर्थक्षेत्र म्हणून कोणाचाही विकास करायला आमचा विरोध नाही. तर सरकारची भूमिका मुख्यमंत्री ठाकरे स्पष्ट करतील, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याने शिर्डी संदर्भातील आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. कोणत्याही जागेच्या विकासासंदर्भात आमची विरोधाची भूमिका नाही. मात्र, आज (सोमवारी) झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री त्यावर निर्णय देतील. तसेच पाथरी आणि शिर्डीच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. आम्ही रात्रीच आमचे आंदोलन मागे घेतले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आम्ही समाधानी झालो आहोत, अशी प्रतिक्रिया शिर्डी येथील शिष्टमंडळातील सदस्याने दिली आहे.
हेही वाचा - पाथरीकरांना मुंबईचे निमंत्रणच नाही; मंगळवारच्या बैठकीत पुढील आंदोलनाचा निर्णय होणार
यावेळी शिर्डीच्या शिष्टमंडळाकडून सह्याद्री अतिथी गृहावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि साई बाबांच्या नावाच्या घोषणाही देण्यात आल्या. शिर्डी येथील शिष्टमंडळात अभय शेळके पाटील, कमलाकर कोते, संग्राम कोते आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीनंतर आता शिर्डी-साईबाबांच्या जन्मभूमी वादावर आता पडदा पडला आहे.