मुंबई Rohit Pawar Criticism BJP : खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. शरद पवारांच्या आदेशाने हा पक्ष चालत असतो. जे नेते शरद पवारांना, पुरोगामी विचारांना सोडून भाजपासोबत गेले आहेत ते स्वतःच्या आदेशावर चालत नाही; मात्र भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या आदेशावर चालत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातील काही नेत्यांनी आदेश दिला असेल की, (Rohit Pawar) तुम्ही काही आमदारांना अपात्र करा. तसं पत्र त्यांनी 'इलेक्शन कमिशन'ला दिलं असावं. निवडणूक आयोग हे भाजपाच्या हातातील एक बाहुलं आहे. त्यामुळे ते कोणाच्या बाजूने निर्णय देईल याचा काही अंदाज आपल्याला आला आहे. मात्र, जेव्हा हा विषय न्यायालयात जाईल त्यावेळेस निर्णय मात्र शरद पवारांच्याच बाजूने लागेल हे आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
पवार आणि पटेलांचा फोटो व्हायरल : शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवारांनी तो फोटो कुठेही टाकलेला नव्हता. तो ज्या व्यक्तीने टाकला त्यांनाच विचारा की, तो फोटो का टाकला? फोटोच्या माध्यमातून 'परसेप्शन' तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा कोणताही फायदा त्यांना होणार नाही. लोकांना सर्व कळते असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
एक प्रकारे ब्लॅकमेलिंगच : जनतेच्या हिताची एखादी योजना असेल सरकार कोणाच्या विचारांचे आहे याचा विचार न करता सरकारमधील मंत्र्यांनी जनतेच्या विकासाच्या कामांना झुकते माप देऊन सह्या केल्या पाहिजे आणि विकासकामे मार्गी लावली पाहिजे. मात्र, आता नवीन प्रथा सुरू झाल्याचं समजतंय. तुम्ही आमच्या बाजूला या, नाहीतर आमच्या बाजूचे असल्याचं प्रतिज्ञापत्र द्या. मग तुमचं काम करू. त्यामुळे काही आमदारांना पर्याय राहात नाही. शेवटी स्वाभिमान टिकला पाहिजे जपला पाहिजे, अशी भूमिका आम्ही सर्वजण घेत असतात. तर काही लोक तात्पुरता विचार करतात. त्यामुळे काही जण कदाचित प्रतिज्ञापत्रावर काम करत असतील. प्रतिज्ञापत्र देत असेल तर काम करेल. साध्या भाषेमध्ये याला कुठेतरी 'ब्लॅकमेलचं' म्हटलं जात असल्याचं आमदार रोहित पवार म्हणाले आहे.
भाजपाला लोकनेते आवडत नाहीत : भाजपाची प्रवृत्ती आपण बघितली तर त्यांना कुठलाही लोकनेता आवडत नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे मधुकरराव पिचड, नितीन गडकरींचं काय झालं? जे नेते भाजपाजवळ गेले त्यांना संपवायचं काम केलं गेलं. मोहिते, पिचड आज कोठे आहेत? असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील होईल आणि अजित पवारांचं काय होतंय ते तर तुम्ही बघत आहात. विधानसभा अध्यक्ष निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बाजूने देतील. मात्र हा विषय कोर्टात जाणार. भाजपाच्या देखील मनात आहे की, विषय कोर्टाकडे जावा आणि शिंदे गटाचे 16 आमदार निलंबित व्हावे. त्या 16 आमदारांच्या जागेवर भाजपाच्या काही आमदारांना मंत्रिपदं दिली जातील, अशा प्रकारची रणनीती भाजपाची आहे.
शिंदे-पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न : फाईलवरील अजित पवारांनी आज सही केल्यानंतर ती फाईल उद्या मुख्यमंत्र्यांकडे जाते. तसंच पत्रकार परिषदेमध्ये देखील माईक कोणाकडे जास्त वेळ असतो, याचा अंदाज येऊन जाईल. मराठा आरक्षण समिती मुद्द्यावरून एका बाजूला मुख्यमंत्री शिंदे यांना अडचणीत आणले जाते तर मावळचा विषय काढून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडचणीत आणले जाते. भाजपाने या दोन्ही लोकनेत्यांना अडचणीत आणून यांचं अस्तित्व फक्त लोकसभेपर्यंत ठेवलं आहे. त्यानंतर या दोघांनाही भाजपाच्या चिन्हावर लढावे लागेल, अशा प्रकारचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. भाजपाला फक्त सत्ता हवी आहे. त्यांना फक्त स्वतःचा अजेंडा पुढे घेऊन जायचंय, महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा असल्याचा घणाघात रोहित पवार यांनी भाजपावर केला आहे.
हेही वाचा:
- MLA Disqualification Case : ठरलं! 'या' तारखेपासून आमदार अपात्रतेसंदर्भात होणार सुनावणी; राहुल नार्वेकरांची माहिती
- Aaditya Thackeray on Democracy : देशात आणि राज्यात लोकशाही उरली नाही; आदित्य ठाकरेंचा घणाघात
- Indus Waters Treaty : सिंधू जल करार; भारत पाकिस्तान तटस्थ लवादाच्या बैठकीत सहभागी, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती