मुंबई - एका विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे युवक-युवती मेळावे अनेक वेळा पहायला मिळतात. मात्र, समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून आज (4 जानेवारी)लग्नासाठी जाती-धर्माचा विचार न करणाऱ्या युवक-युवतींचा मेळावा पार पडला. राष्ट्र सेवा दल आणि छात्रभारती तर्फे दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
साहित्यिक डॉक्टर गणेश देवी यांनी काही दिवसांपूर्वी धर्माचा विचार न करता लग्न करण्याचे आवाहन युवक-युवतींना केले होते. त्याला राज्यभरातील सुमारे पाच हजार युवक-युवतींनी प्रतिसाद दिला. मुंबईतील अशा युवक-युवतींचा संवाद मेळावा आज दादरच्या राजा शिवाजी विद्यालय येथील बी. एन. वैद्य सभागृहात पार पडला. या मेळाव्यात लग्न करताना जाती-धर्माची विचारणा न करणाऱ्याचा निर्धार केलेल्या युवक-युवतींनी उपस्थित दर्शवली होती.
हेही वाचा - 'सैराट'ची पुनरावृत्ती; आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध करत बापानेच केले मुलीच्या शरीराचे तुकडे
आज छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे 37वे राज्य अधिवेशन होते. याला जोडूनच राष्ट्रसेवा दल आणि छात्रभरती यांनी एकत्र येत या मेळाव्याचे आयोजन केले होते. "जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर, जास्तीत जास्त तरूणांनी आंतरजातीय विवाह करावा", असे मत डॉ. गणेश देवी यांनी यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे. या मेळाव्याला अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, आमदार कपिल पाटील तसेच इतर मान्यवरांनी तरुणांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.