मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज भाजपा नेते राम कदम यांनी मुंबईत मंत्रालयाबाहेर उपोषण करत अर्णब यांना सोडण्याची मागणी केली. या सरकारने पत्रकारांची मुस्कटदाबी थांबवावी, अशी मागणी कदमांनी केली आहे.
लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न -
पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही, म्हणून नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अडकवण्यात आले. नाईक यांची केस 2018 सालीच बंद झाली होती. केवळ सुडाच्या भावनेने ती पुन्हा उघडण्यात आली आहे. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी ही घटना आहे. त्यामुळे पत्रकारांची गळचेपी बंद करा व अर्णबला सोडून द्या, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.
राज्यपालांचीही घेतली होती भेट -
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपाने आक्रमक होत राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. गोस्वामी यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपा करत आहे. भाजपा नेते राम कदम यांनी याबाबत राज्यपालांची भेट घेऊन मारहाण करणाऱ्या पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केलेली आहे. ही सरकारची दडपशाही आहे. कोणालाही पोलिसांच्या माध्यमातून अडकवले जात आहे. राज्यात पत्रकाराला मारहाण करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान आहे. राज्यात जे चालले आहे ते चुकीचे आहे, असे राम कदम यांचे म्हणणे आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केले होते आवाहन -
टीआरपी घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अर्णब गोस्वामी चर्चेत आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या मृत्यू प्रकरणात गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी यांचा निषेध करत याविरोधात आंदोलन व समाज माध्यमावर आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार भाजपा नेते सर्वत्र आंदोलने व निदर्शने करत आहेत.
हेही वाचा - राज्यपालांना भेटत भाजपा नेत्यांनी केली पोलिसांना निलंबित करण्याची मागणी